सभेचे मुखपत्र – “गौड ब्राह्मण” त्रैमासिक
“गौड ब्राह्मण सभा” या संस्थेच्या स्थापनेला आज १२२ वर्षे पूर्ण होत आहेत तर गौड ब्राह्मण सभेतर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या “गौड ब्राह्मण” या त्रैमासिकाने ८१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे !
आज आपण सर्वजण मोबाईल,इंटरनेट तसेच वेगवेगळया सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असतो. परंतु सुमारे ८१ वर्षापूर्वीचा काळ यापेक्षा खूप वेगळा होता. त्या काळी संगणक आणि दूरध्वनी तर दूरची गोष्ट, साधा पत्रव्यवहारही खूप दुर्मीळ असे. अशा वेळेस निरनिराळ्या प्रांतात पसरलेल्या आपल्या आप्तेष्टांची, प्रियजनांची ख्यालीखुशाली कळणे मोठे कठीण काम होते.
अशा बिकट परिस्थितीमध्ये एकमेकांशी संपर्क, माहितीची देवाणघेवाण आणि समाजप्रबोधन याकरिता ज्ञातिबांधवांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या त्रिसूत्रीवर आधारित “गौड ब्राह्मण” या त्रैमासिकरूपी सेतुचा उदय झाला. या सेतुने दूरवर स्थिरस्थावर झालेल्या सर्व ज्ञातिबांधवांना एका निश्चित विचारसरणीने एकमेकांशी जोडण्याचे काम केले. हा सेतू ८१ वर्षानंतर आजही प्रगत तंत्रज्ञान युगात आपले कार्य अखंड बजावत आहे. त्याच्या स्वरूपात आणि गुणवत्तेत उत्तरोत्तर प्रगती होऊन त्रैमासिकाची अविरत घोडदौड चालू आहे.
सुरुवातीला सन १९२६ साली स्व. श्री. रावबहाद्दूर वासुदेव बांबर्डेकर, स्व. श्री. रामकृष्ण विठ्ठल मतकरी, व स्व. श्री. कृष्णराव पाटकर या त्रयीने “आद्य गौड ब्राह्मण” नावाचे द्वैमासिक सुरू केले. यानंतर सन १९३९ मध्ये या द्वैमासिकाचे “गौड ब्राह्मण” या त्रैमासिकात रूपांतर करण्यात आले. हे विचारात घेता या ज्ञातीवृत्ताची परंपरा तब्बल ९४ वर्षे जुनी मानावी लागेल हे विशेष!
सदर त्रैमासिकाच्या माध्यमातून ज्ञातीमध्ये होणाऱ्या महत्वपूर्ण घडामोडींचा, ज्ञातीमधील तरुण पिढीच्या नव्या विचारप्रणालीचा तसेच इतर बाबींचा परामर्ष घेतला जातो शिवाय ज्ञातिबांधवांना संघटित करून समाज प्रबोधनाचे कार्य केले जाते.
सन १९२६ ते १९३९ या कालखंडात स्व. श्री. रामकृष्ण विठ्ठल मतकरी यांनी ‘आद्य गौड ब्राह्मण’ द्वैमासिकासाठी तर १९३९ ते २०११ या कालखंडात स्व. श्री. नारायण गणेश सामंत, स्व. श्री. गं. दे. खानोलकर, स्व. श्री. अनंत गणेश देसाई, स्व. डॉ. दि. ग. नाईक, स्व. श्री. द. पा. नाईक, स्व. श्री. ज. भ. महाजन, डॉ. रवींद्र रामदास, स्व. श्री. गणपत गोविंद सामंत, स्व. श्री. भालचंद्र राजाराम सामंत, स्व. श्री. दिनकर वामन सामंत, स्व. श्री. ना. भा. कुलकर्णी, स्व. श्री. म. ल. सामंत, स्व. श्री. ह. रा. सामंत, श्री. श्री. बा. पाटील, स्व. श्रीमती विनया गुंडू आजगावकर या समाज धुरंधरांनी ‘गौड ब्राह्मण’ त्रैमासिकासाठी संपादकपदाची यशस्वी धुरा वाहिली. त्यानंतर सन २०११ पासून ते आजतागायत श्री उमाकांत गणपत महाजन हे संपादक पदावर कार्यरत आहेत.
वृत्तपत्र माध्यमामध्ये आपल्या ज्ञातीचे फार मोठे योगदान आहे. दै. तरुण भारत, दै. सकाळ, बेळगाव समाचार, साप्ताहिक आघाडी, साप्ताहिक व्याध, कोकण वैभव, साप्ताहिक डहाणू वार्ताहर ह्या ज्ञातीबांधवांच्या वृत्तपत्रांनी महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला आहे. गौड ब्राह्मण त्रैमासिकानेदेखील गेली ८१ वर्षे ही परंपरा जोपासण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. कोकणात अनेक ज्ञातीबांधवांकडे ज्ञातीकामानिमित्त फिरताना गौड ब्राह्मणचे अनेक अंक (आपल्या कर्तृत्ववान आजी/आजोबा/पणजोबांची माहिती अंकात असल्यामुळे) कुटुंबांनी निष्ठेने जतन केलेले आढळतात.
ज्ञातीचे हे मुखपत्र संपर्काचे प्रमुख माध्यम असण्यासोबतच ज्ञातीबंधावांच्या लेखन उर्मीला प्रोत्साहन देत असते. तसेच समाज प्रबोधनाचे एक महत्त्वाचे कार्य करते. पूर्वी केवळ ९९ सभासद असणाऱ्या या त्रैमासिकाचे आज जवळपास ३००० हून अधिक सभासद असून त्यांना हे मुखपत्र विनामूल्य टपालाद्वारे घरपोच पाठवले जाते. त्यासाठी सभेचे सभासदत्व स्वीकारणे गरजेचे आहे.
संपादकीय मंडळ
सभेतर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या “गौड ब्राह्मण” या त्रैमासिकाच्या संपादकीय मंडळावर ज्ञातीतील खालील माननीय व्यक्ती कार्यरत आहेत.
संपादक Shree Yogesh Khanolkar Phone: +91 8108367933